२६ ठिकाणचे ड्रोन हल्ले निष्प्रभ   

नवी दिल्ली : पाकिस्तानने शुक्रवारी रात्री जम्मू-काश्मीरपासून गुजरातपर्यंत २६ ठिकाणी केलेले ड्रोन हल्ले भारताने निष्प्रभ केले. मागील तीन दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमा रेषा आणि नियंत्रण रेषेसह अन्य भागांत ड्रोन, क्षेपणास्त्रे, तोफांचा भडिमार आणि बेछूट गोळीबार केला जात आहे. भारतीय सशस्त्र दलाकडून हे सर्व हल्ले निष्प्रभ केले जात आहेत. दरम्यान, उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज येथील भारतीय हवाई दलाच्या तळांवर किरकोळ नुकसान झाले, असेही लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
पाकिस्तानचे दावे खोटे
 
पाकिस्तानकडून भारतीय सशस्त्र दलाचे मोठे नुकसान केल्याचे खोटे दावे केले जात असल्याचे संरक्षण प्रवक्त्यांनी सांगितले. पाकिस्तानने आदमपूरमध्ये भारताची एस-४०० प्रणाली, सुरतगड आणि सिरसा येथील हवाई तळ, नागरोटा येथील ब्रह्मोस तळ नष्ट केल्याचा दावा केला. मात्र, तो पूर्णपणे खोटा असून पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पंजाब आणि राजस्तानमधील हवाई दलाच्या तळांची खोटी छायाचित्रे पाकिस्तानने दाखविली, असेही त्यांनी स्पष्ट केली. कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी आणि अखनूर परिसरात पाकिस्तानकडून तोफांचा भडिमार आणि गोळीबार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय क्षेपणास्त्रांनी अफगाणिस्तानवर हल्ला केल्याचे पाकिस्तानचे आरोप खोटे असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. तसेच, पाकिस्तानचा दावा हास्यास्पद असल्याचेही अधिकार्‍यांनी सांगितले.

Related Articles